Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रस्त्याच्या खड्ड्यात आकाश दिसू लागले !! काय साहेब आम्हांलाच फसू लागले!!



■ रस्त्याच्या खड्ड्यांत जनता अडकली; आता लढा उठणार!"


■ प्रशासनाला नागरिकांचा इशारा – लोकभावनेचा सन्मान करा!


■ आंदोलन शांततापूर्ण पण ठाम – समाधानकारक तोडगा निघेपर्यंत मागे हटणार नाही


शहापूर | गणेश आहिरे


शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गावरील शहापूर ते कोळकवाडी दरम्यानचा रस्ता गेल्या आठ वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, नागरिकांची सहनशक्ती आता संपत आली आहे. वारंवार विनवण्या करूनही दखल न घेतल्यामुळे आता नागरिकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सापगाव येथे लिबर्टी ऑईल मिलसमोर हे जनआंदोलन छेडले जाणार आहे.


वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याचे प्रश्न कायम


एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील या महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. परिणामी या भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गंभीर आजाराचे रुग्ण, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवासी यांच्यासाठी हा रस्ता आता धोकादायक ठरू लागला आहे.


जुन्या आंदोलनांना केवळ थातूरमातूर मलमपट्टी करून वेळ मारून नेण्यापलिकडे कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.


राजकीय हस्तक्षेप नको – सर्वसामान्यांचे आंदोलन


या आंदोलनामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे आंदोलन केवळ रस्त्याच्या समस्येवर केंद्रित असून, कोणतीही गटबाजी, पक्षीय द्वेष किंवा आक्षेपार्ह घोषणाबाजी याला स्थान दिले जाणार नाही. शांततेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे आंदोलन करण्यात येणार आहे.


पोलीस आणि रुग्णवाहिकांना सवलत, पण मागणी ठाम


आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा यांना अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. मात्र, जोपर्यंत प्रशासनाने ठोस कृती आराखडा जाहीर केला नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा इशारा जनसंघर्ष समितीच्या डॉ. अपर्णा खाडे यांनी दिला आहे.


काय आहे नागरिकांची मुख्य मागणी?


सापगाव-कोळकवाडी मार्ग तत्काळ दुरुस्त करावा


कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण करावे


रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी निधीची हमी द्यावी


एमएसआरडीसीने वेळकाढूपणा थांबवून जनभावनेचा आदर करावा



विविध गावांमधून मोठा प्रतिसाद अपेक्षित


या आंदोलनात डोळखांब, किन्हवली, धसई, नडगाव, वासिंद, कसारा, ठिळे, लेनाड, जांभे, शिलोत्तर, शेंद्रुण आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


"सडलेल्या रस्त्यावरून चालत चालत अखेर जनतेचा संयम संपला... आता प्रश्न मार्गी लागेपर्यंतच आंदोलन मागे घेतले जाणार!"



Post a Comment

0 Comments