वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
बारामती: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या खाजगी विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली -
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या 'एक्स' हँडलवरून दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने मी स्तब्ध झाले आहे. मी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी, मुले आणि पवार कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त करते."
अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे झंझावाती सभेसाठी रवाना झाले होते. बारामती विमानतळावर विमान लँडिंगच्या तयारीत असतानाच वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच विमान धावपट्टीच्या जवळ असलेल्या शेतात कोसळले आणि विमानाने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण विमान जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने कोणाचेही प्राण वाचवता आले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे.


Post a Comment
0 Comments