प्रतिनिधी-शंकर गायकवाड
नागपूर : जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील महादुला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आणि पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
बैठकीचे अध्यक्षस्थान राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा प्रभारी कुशलभाऊ मेश्राम यांनी भूषविले, तर निवडणूक निरीक्षक प्रा. अनिकेत मून यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना कुशलभाऊ मेश्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. “गाव तिथे शाखा” ही मोहीम प्रभावीपणे राबवून प्रत्येक गावात पक्षाची ताकद वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनकर सोनवणे, ममता रामटेके, पंचफुला मेश्राम, पुरुषोत्तम सोमकुवर, भीमराव सोमकुवर, मुकुल बागडे आणि भालचंद्र भादी यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अजय सहारे, शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके, जिल्हा महासचिव सी. सी. वासे, राजेश ढोके, उपाध्यक्ष वैशाली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे चित्र दिसून आले. बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन अधिक सक्षम करण्याचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments