प्रतिनिधी-मनोहर गायकवाड
मुंबई -एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा राजकीय निर्णय घेत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना अखेरच्या क्षणी वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या जागेसाठी आनंदराव अडसूळ,गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे आणि शैनाज एनसी यांची नावे आघाडीवर मानली जात होती. मात्र तुलनेने नवख्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना संधी देत पक्षाने वेगळा निर्णय घेतला.
कोण आहेत ज्योती वाघमारे?
मूळच्या सोलापूर येथील डॉ. ज्योती वाघमारे या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अभ्यासू व स्पष्टवक्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी मिळवली असून महिलांच्या प्रश्नांवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
त्या दहा वर्षांहून अधिक काळ अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होत्या. मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. काही काळ त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले आहे.
सामाजिक कार्याचा वारसा
त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. समाजकारणात योगदान दिल्यामुळे सोलापूरकरांनी त्यांना नगरसेवक म्हणूनही निवडून दिले होते. त्याच सामाजिक कार्याचा वारसा ज्योती वाघमारे पुढे नेत आहेत.


Post a Comment
0 Comments