वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
भारतीय समाजात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळे समाज विविध जाती, पंथ, गट व उपगटांमध्ये विभागला गेला आहे. यात अल्पसंख्याक श्रीमंत, उच्चशिक्षित व साधनसंपन्न समाज तर आहेच; पण बहुसंख्य मागासवर्गीय जनता अजूनही गरीब, निरक्षर, अंधश्रद्ध, रोजगारहीन आणि नागरी सुविधांपासून वंचितच राहिली आहे.
![]() |
| कार्यकारी संपादक : रितेश साबळे |
या वर्गावर आजही अन्याय, अत्याचार व शोषण चालू आहे. त्यांच्याच कष्टावर सुख, सत्ता व भोग यांचा उपभोग घेतला जातो. याचे एकमेव कारण म्हणजे मागास समाजाचे असंघटित व जागृतीविरहित असणे. त्यांनी आपल्या हक्कांची व अधिकारांची जाणीव न ठेवता प्रस्थापितांचे गुलाम बनून राहणे, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
जरी मागासवर्गीयांसाठी अनेक संघटना कार्यरत असल्या , तरी त्यांच्यात एकात्मता, अभ्यास, सामाजिक बांधिलकी आणि ध्येयवादी दृष्टिकोनाचा अभाव आहे. सर्व संघटना स्वतंत्र झेंडे घेऊन आपल्या-आपल्या नेत्यांच्या जयजयकारातच अडकून राहिल्या आहेत. *त्यामुळे शत्रूला त्यांच्यात फूट पाडून त्यांची कमजोरी शोषण्यात आणखी यश मिळते आहे.*
या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक मागासवर्गीय संघटनेने एकत्र येऊन एक शिखर समिती निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी संघटनांना आर्थिक बळ, विचारवंत कार्यकर्ते, साधनसंपन्नता आणि सर्वसामान्य जनतेचा सक्रिय सहभाग मिळणे अत्यावश्यक आहे.
श्रीमंत व गरीब समाजातील सर्व घटकांनी संघटनांना त्यांच्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करण्याची प्रतिज्ञा करावी.आपल्या महामानवांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, *संविधान वाचवायचे असेल, तर संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही, हे समजून घेतले पाहिजे.*
*याचबरोबर मागासवर्गीयांचे आमदार, खासदार, मंत्री आणि स्थानिक नेत्यांनीदेखील संघर्षासाठी लागणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्या पाहिजेत. सरकार जर मागासवर्गीयांच्या न्याय्य मागण्या मान्य करत नसेल, तर अशा नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी. याच प्रसंगी त्यांचा त्याग, सेवाभाव व सामाजिक बांधिलकी सिद्ध होईल.*



Post a Comment
0 Comments