Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

केडीएमसीच्या बसेस रस्त्यावरच बंद, नागरिक संतापले.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

मनोहर गायकवाड 

कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामधील अनेक नागरिकांना वाहतूकीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानगर पालिकेच्या परिवहन विभागाचा भोंगळ कारभार अनेकदा नागरिकांना पाहायला मिळाला आहे. कल्याण- मोहोने कॉलनीदरम्यान सुरू असलेली बससेवा अनेकांसाठी लाईफ लाईन ठरली आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईला प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही बससेवा खूप उत्तम ठरली होती. या मार्गावर महानगर पालिकेच्या परिवहन विभागाला प्रवाशांची दिलासा दायक प्रतिसाद मिळत असतानाही ही बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


कल्याण- मोहोने कॉलनीदरम्यान जाणीवपूर्वक भंगार आणि नादुरुस्त बस सोडल्या जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या मार्गावरील बस बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एनआरसी कॉलनी मार्गावरील बस गुरूवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी रस्त्यात बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मागील काही दिवसांपासून बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे ग्रहण कधी संपणार, असा सवाल प्रवासी करीत होते. गुरुवारी सायंकाळी मुख्य रस्त्यावरच बस बंद पडली. यामुळे आणखी दोन बस कॉलनीच्या आत अडकून पडल्या.


यावेळी, कल्याणकडे जाणारी आणि येणारी संपूर्ण वाहतूक कोलमडली होती. रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवासी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करीत होते. कल्याण- मोहने कॉलनीदरम्यान असलेल्या बससेवेचा दररोज हजारो प्रवासी लाभ घेत असतात. या मार्गावर इतकी प्रवाशांची वर्दळ असतााही येथे नेहमीच जुन्या- नादुरुस्त बस का सोडल्या जातात ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून कोणतं राजकारण चालू आहे? बससेवा न सुधारल्यास व नादुरुस्त बस थांबवल्या नाहीत, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा मोहोनेकरांनी दिला आहे.



Post a Comment

0 Comments