वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
ठाणे जिल्हाप्रमुख मनोहर गायकवाड
रायगड – भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष उलटून गेले तरी जातिवाद, उच्च-नीच भेदभाव आणि अस्पृश्यतेची दाहक उदाहरणे अद्याप समाजात पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारची गंभीर घटना रोहा तालुक्यातील भालगाव येथे घडली असून यात आदिवासी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुमीत मंगेश वाघमारे हा मिठागर येथील एका मुलीसोबत तिच्या घरी गणेश दर्शनासाठी गेला होता. याचाच राग धरून आरोपींनी भालगाव येथील आदिवासी वाडीत धाव घेत वाघमारे यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात मंगेश वाघमारे यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, काका आणि चुलत भावाला लाथाबुक्क्या व धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली. यात चुलत भाऊ रामचंद्र वाघमारे यांच्या डोक्यावर तर मुलगा सागरच्या पायावर गंभीर दुखापत झाली.
जखमींना तात्काळ मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रायगडचे उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मंगेश महादेव वाघमारे यांच्या तक्रारीनुसार दिपेश कृष्णा ठाकूर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकूर, विराज विजय ठाकूर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापुरकर, दिपेश दत्ताराम माळी, विनिते विजय ठाकूर आणि सागर पांडुरंग ठाकूर या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.


Post a Comment
0 Comments