वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड येथील औद्योगिक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. पाणी साठल्याने अनेक उद्योगांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, स्थानिक एमआयडीसी प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर रस्त्यावर कामगार चौक भागात पाणी तुंबल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रमुखांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
औद्योगिक वसाहतीतील वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर रांजणगाव शेणपुंजी गावातून स्टरलाइट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय, पैठण औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्याचे पाणी मुधलवाडी व परिसरातील शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती सामंत यांनी दिली.



Post a Comment
0 Comments