वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड.
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीलगत असलेल्या गावी अतिवृष्टी पावसामुळे व जायकवाडी धरणातून दोन वेळा सोडण्यात आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली असून शेतीची सुपीक जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये एकरी शेती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किर्ती वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ शरणांगत यांनी केली आहे.
रामपुरी, मनुबाई जवळा, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, ढालेगाव, तपेलिंबगाव ही गावे थेट गोदावरी काठावरील असल्याने सर्वाधिक नुकसानग्रस्त झाली आहेत. मात्र, अद्याप महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या गावांना भेट दिलेली नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शरणांगत म्हणाले की, "बीड जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली असून नागरिक, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे चित्र टीव्ही, वृत्तपत्रे, यूट्यूब चॅनल्स व प्रत्यक्ष सर्वांनी पाहिले आहे. मग केवळ पाहणी दौरे करून नेत्यांनी स्टंटबाजी करण्याऐवजी तातडीने मदत करावी. जर सरकारने मदत करायची असेल तर सरसकट मदत करावी व बीड जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा."
ते पुढे म्हणाले की, महसूल मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी पावसाची नोंद घेतली आहे, त्यामुळे शासनाकडे पुरेशी माहिती पोहोचली आहे. तरीही मदत न झाल्यास शेतकरी खचून जात आहेत. "शेतकऱ्यांच्या हातातला घास हिरावून घेतला गेला आहे, त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सरकारने तात्काळ निर्णय घेऊन मदत जाहीर केली पाहिजे," अशी मागणी विश्वनाथ शरणांगत यांनी केली.



Post a Comment
0 Comments