वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
लेह – लद्दाख साठी स्वतंत्र राज्याचा दर्जा व सहाव्या अनुसूचीअंतर्गत संवैधानिक संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन बुधवारी हिंसक बनले. आंदोलकांनी लेह शहरातील भाजप कार्यालयावर हल्ला करून आग लावली. त्याचबरोबर काही सरकारी कार्यालयांमध्येही तोडफोड करण्यात आली.
या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ७० ते ८० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस व आंदोलकांमध्ये तुफान दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधूराचे नळकांडे फोडले. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळी भाजप कार्यालयाबरोबरच रस्त्यावर उभ्या असलेल्या काही वाहनांनाही आग लावण्यात आली. या घटनेनंतर प्रशासनाने लेह शहरात कर्फ्यू लागू केला असून इंटरनेट सेवांवर बंधने आणली आहेत.
सरकारने याला एक पूर्वनियोजित कट असल्याचे सांगितले आहे. “हे आंदोलन स्वाभाविक नसून काही राजकीय पक्षांच्या प्रोत्साहनाने झाले आहे,” असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे आंदोलकांचे म्हणणे आहे की, “लददाखच्या लोकांच्या योग्य मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले.”
सदर प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. केंद्र सरकारकडून मात्र परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला आहे.



Post a Comment
0 Comments