Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हा परिषद शाळांतील ४ हजारांहून अधिक शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक; शिक्षकांच्या तक्रारींमुळे प्रशासनाची अडचण वाढली

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

कार्यकारी संपादक रितेश साबळे

पुणे (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियेला सध्या तात्पुरता ब्रेक बसला आहे. राज्यभरातील सुमारे ४ हजारांहून अधिक शिक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या होत्या, मात्र सुमारे २२५ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी नोंदवल्याने प्रशासनाने ही प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे.


सातही टप्प्यांतील बदल्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या तक्रारी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडे पोहोचल्या. या तक्रारींमध्ये बदल्या करताना जेष्ठतेचा भंग, अपंगत्व प्रमाणपत्रातील विसंगती, चुकीचे अंतर दाखवणे, तसेच स्थानिक राजकीय हस्तक्षेप यांसारख्या गंभीर बाबी मांडण्यात आल्या आहेत.


मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, “प्रशासनाकडे आलेल्या सर्व तक्रारींची पारदर्शक चौकशी केली जाईल. प्रथम टप्प्यात ६६ तक्रारींची सुनावणी केली जाणार असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील बदल्या प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल.”



यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि नाराजी पसरली आहे. अनेक शिक्षकांनी आपली बॅग पॅक करून नव्या ठिकाणी जाण्याची तयारी केली होती; मात्र आदेश मागे घेतल्याने त्यांना शाळांमध्ये परत काम सुरू ठेवावे लागत आहे. काही शिक्षक संघटनांनी या विलंबावर नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.


शिक्षक बदल्या प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला असून, बदल्या पारदर्शकतेसाठी स्वतंत्र चौकशी समितीची नेमणूक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


या निर्णयामुळे शाळांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि विषय शिक्षकांच्या बदल्यांमुळे वर्गांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने शिक्षक व पालक यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.


प्रशासनाचा दावा आहे की, सर्व तक्रारींचे निवारण झाल्यानंतर पुढील काही आठवड्यांत बदल्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल.



Post a Comment

0 Comments