वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी मनोहरजी गायकवाड
ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कबुतराला वाचवण्याचा प्रयत्न करताना ठाणे अग्निशामक दलातील जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तसेच संपूर्ण ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा परिसरात हाय व्होल्टेज विजेच्या तारेवर एक कबुतर अडकले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर ठाणे अग्निशामक दलातील जवान उत्सव पाटील (वय २५ वर्षे) यांनी कबुतराची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान त्यांना विजेचा जबर धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले.
तत्काळ त्यांना ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून पाहिल्यानंतर उत्सव पाटील यांना मृत घोषित केले. एका निष्पाप पक्ष्याला वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या या जवानाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणे अग्निशामक दलात शोककळा पसरली असून त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment
0 Comments