वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
उल्हासनगर :
कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील बहुचर्चित शहाड उड्डाणपूलाच्या डांबरीकरणासाठी ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. काम सुरू असताना विविध नेते, समाजसेवक व कलाकार यांनी भेट देत श्रेय घेण्याची स्पर्धा रंगली असली, तरी प्रत्यक्षात पुलाच्या कामाची गती आणि प्रगती कायम राखणारे खरे मानकरी मात्र पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागच असल्याचे स्पष्ट होत आहे.
उड्डाणपूलाचे डांबरीकरण जलदगतीने पूर्णत्वास नेताना ठाणे वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता विभाग, कल्याण-उल्हासनगर वाहतूक पोलीस तसेच वार्डन यांचा प्रभावी समन्वय महत्त्वाचा ठरला. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच काम नियोजित वेळेत मार्गी लागून आता उड्डाणपूल नागरिकांसाठी लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे.
दरम्यान, समाजसेवक हितेश जेसवानी यांनी सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती करत या कामामागील खऱ्या हिरोंना सलाम केला आहे. प्रखर ऊन–पावसाची तमा न बाळगता दिवस-रात्र मेहनत घेणारे कामगार, वाहतूक वार्डन, वाहतूक पोलीस व अधिकारी यांच्या समर्पित सेवेमुळेच उड्डाणपूलाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहाड उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू असून नागरिकांमध्येही पूल लवकर सुरू होण्याबाबत उत्सुकता आहे.
अशी माहिती पत्रकार कपिल घायवट यास कडून प्राप्त झाली.


Post a Comment
0 Comments