वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग या ‘महागठबंधनाने’ विजय मिळवल्याची कठोर टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसकडून मोठी रणनीतिक चूक झाल्याचे ते म्हणाले. बिहारमध्ये स्वतःची संघटनात्मक ताकद कमी असताना, स्थानिक नेतृत्व नसताना काँग्रेसने आरजेडीशी वाद घालून जास्त जागा घेतल्या. त्या बहुतांश जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला आणि याचा थेट फटका आरजेडी–काँग्रेस आघाडीला बसला, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने आता ‘बिग ब्रदर’ची भूमिका सोडावी, असा थेट संदेश देताना सुजात आंबेडकर म्हणाले, “आम्ही तुम्हाला ब्रदर मानतो, युतीसुद्धा करु; पण तुम्ही आता ‘बिग’ राहिलेले नाही. हे काँग्रेसने ओळखण्याची वेळ आली आहे.”
वंचित बहुजन आघाडी कुठेही युती करणार असेल तर त्या ठिकाणी पक्षाचा सन्मान राखला जाईल, कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, हे निकष महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या काही प्रस्थापित नेत्यांनाही त्यांनी सवाल केला. “तुम्ही कधी शहाणे होणार?” असा टोला लगावत सुजात आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने दाखवलेल्या परिपक्वतेमुळे वंचित बहुजन आघाडीशी सन्मानपूर्वक युती शक्य झाली. हा शहाणपणा २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये राज्यस्तरीय काँग्रेस नेतृत्वाने दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता, असे त्यांनी नमूद केले.


Post a Comment
0 Comments