वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
शहापूर तालुक्यातील किन्हवली (दहिवली) परिसरात काळू नदीच्या पात्रालगत नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर अर्भकाला कोणीतरी जन्मानंतर नदीकिनारी टाकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना काळू नदीच्या काठावर संशयास्पद अवस्थेत काहीतरी दिसून आले. जवळ जाऊन पाहणी केली असता, नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले. नागरिकांनी तत्काळ ही बाब किनवली पोलीस ठाण्याला कळवली.
घटनेची माहिती मिळताच किनवली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. प्राथमिक पाहणीत अर्भक जन्मानंतर काही तासांतच मृत्यू पावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमागे अनैतिक संबंध, सामाजिक दबाव किंवा इतर कोणते कारण आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. संबंधित अर्भकाचे आई-वडील किंवा नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून परिसरातील रुग्णालये, दवाखाने तसेच अंगणवाड्यांची माहिती गोळा केली जात आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास किन्हवली पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे. नागरिकांनी या घटनेबाबत काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments