वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
मोरोची (दि. २४ जानेवारी) : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची येथे विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुरोगामी महाराष्ट्रचे पत्रकार प्रमोद शिंदे, प्राध्यापक साळवे, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील, जिलानी आतार, समन्वयक समीर पठाण तसेच शिक्षिका सुनंदा पवार व मनीषा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.
यानंतर मान्यवरांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यामागील लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य व बंधुता या तत्त्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितले.
यावेळी पत्रकार प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनून संविधानाचे रक्षण करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जाणीव-जागृती निर्माण करणे ही शाळेची सामाजिक जबाबदारी असल्याचे नमूद केले.
प्राध्यापक साळवे यांनी संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे प्रतिपादन केले.
शिक्षकांच्या भाषणात अलका शिंदे मॅडम यांनी संविधानाचे महत्त्व व कार्य विशद केले, तर सुरेश कांबळे यांनी संविधान निर्मितीविषयी मार्मिक माहिती दिली.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वरिष्ठ समन्वयक समीर पठाण, अलका शिंदे व सीमा कांबळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या संयोजनात अलका शिंदे व सीमा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेत सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.



Post a Comment
0 Comments