वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी - शंकर गायकवाड
लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ७० पैकी तब्बल ४७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय लातूरकर जनतेला जाते. त्यामुळे मी सर्व लातूरकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वजण सदैव प्रामाणिकपणे आणि कटिबद्धपणे कार्यरत राहू.
या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार विजयी झाले, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच ज्या उमेदवारांनी जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणे ही निवडणूक लढवली, मात्र त्यांना यश मिळाले नाही, त्यांचेही मी अभिनंदन करतो. आगामी काळात त्यांनाही सामाजिक कार्यासाठी योग्य संधी व जबाबदारी नक्कीच मिळेल, असा मला विश्वास आहे.
या निकालातून लातूरची जनता शांत, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्ष व इतर घटक पक्षांनी इतर शहरांप्रमाणे लातूरमध्ये येऊन वादग्रस्त वक्तव्ये केली, अफवा पसरवल्या आणि समाजात द्वेष व फूट निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र लातूरकरांनी हे सर्व प्रयत्न ठामपणे उधळून लावले आहेत. लातूर हे विविधतेने नटलेले, सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे.
काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने शहराच्या या वैशिष्ट्यांना अनुरूप अशी आघाडी या निवडणुकीत केली होती. ही आघाडी लातूरकरांना मनापासून पसंत पडल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी लातूरचे हे वेगळेपण जपत विकास प्रक्रियेला गती दिली. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेच कार्य पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. असे असताना, या महान नेत्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा भाजपच्या काही नेत्यांनी निवडणुकीदरम्यान केली. लातूरच्या जनतेने या विधानांनाही या निकालातून योग्य संदेश दिला आहे.
लातूर हे मराठवाड्यातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर आहे. या विकास प्रक्रियेला बळ देण्यासाठी जनतेच्या सूचनांवर आधारित पंचसूत्री जाहीरनामा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने मांडला होता. या जाहीरनाम्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.
या निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी भक्कम पाठबळ दिले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार व जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख, युवा नेते सुजात आंबेडकर, प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद, काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, भाऊसाहेब आजबे, स्टार प्रचारक हनुमंत पवार यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी यांनी प्रचारासाठी मोलाचे योगदान दिले.
तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडदेत्तीवार, माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले. स्थानिक काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सहकार्य केले, त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.



Post a Comment
0 Comments