प्रतिनिधी - शंकर गायकवाड
पुणे : सामाजिक समतेचा ध्यास घेत अन्यायाविरुद्ध लढणारे महान क्रांतिकारक व समाजप्रबोधनाचे योद्धा वस्ताद लहुजी साळवे यांचा स्मृतिदिन आज विविध ठिकाणी अभिवादन करून साजरा करण्यात आला.
लहुजी साळवे हे केवळ पराक्रमी तलवारबाज नव्हते, तर ते विचारांचे योद्धा होते. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि बहिष्कृत घटकांना आत्मसन्मान, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या तालमीतून घडलेले अनेक तरुण अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाले.
सामाजिक क्रांतीचे शिल्पकार महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामागे लहुजी साळवे यांची प्रेरणा व मोलाची साथ होती. शिक्षण, समता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी सुरू झालेल्या चळवळीला त्यांनी बळ दिले. “गुलामी ही केवळ शरीराची नसून मनाचीही असते आणि मुक्ती दोन्हींची आवश्यक असते,” हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे.
लहुजी साळवे यांनी आपल्या नात्यातील धाडसी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांना सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिक्षणासाठी दाखल केले. १९व्या शतकातील प्रबोधनशील लेखिका म्हणून मुक्ताबाई यांनी “मांग-महारांच्या दुःखाविषयी” हा प्रभावी लेख लिहून जातिव्यवस्थेवर तीव्र भाष्य केले. मुक्ताला मुक्त विचारांचे पंख देण्याचे कार्य वस्ताद लहुजींनीच केले.
इतिहासातील उल्लेखांनुसार, पुण्यातील कर्मठ घटकांकडून फुलेंवर जीवघेणा हल्ला घडवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र फुलेंनी मारेकऱ्यांचे परिवर्तन करून त्यांना आपल्या चळवळीत सामील करून घेतले. पुढे हेच कार्यकर्ते लहुजी वस्तादांच्या तालमीत घडून फुले चळवळीचे संरक्षक बनले, अशी परंपरा सांगितली जाते.
आजच्या काळात लहुजी साळवे यांचे स्मरण म्हणजे केवळ इतिहासाचा पुनरुच्चार नाही, तर समतेसाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची नवी प्रेरणा आहे.
वस्ताद लहुजी साळवे यांना विनम्र अभिवादन! 🙏


Post a Comment
0 Comments