संपादकीय
मुंबई - मुंबईच्या मालाड परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उंदरांपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी एका फळविक्रेत्याने ‘Ratol’ नावाचे उंदीर मारण्याचे विष काही फळांवर लावल्याचा आरोप समोर आला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विक्रेता उंदरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा धोकादायक मार्ग वापरत होता. फळांच्या सालीवर विषारी क्रीम लावल्याने उंदीर दूर राहतात, असा त्याचा दावा आहे. मात्र या कृत्यामुळे ग्राहकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
आरोग्यास गंभीर धोका
‘Ratol’ सारख्या विषारी पदार्थांमध्ये अत्यंत घातक रसायने असतात. अशा फळांचे सेवन झाल्यास उलट्या, पोटदुखी, अन्नविषबाधा यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेच यकृतास गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विक्रेत्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनी फळे खरेदी करताना काळजी घ्यावी, तसेच स्वच्छ धुऊनच सेवन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments