किन्हवली : शंकर गायकवाड
मराठी भाषा गौरव दिन तथा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त किन्हवलीजवळील सावरोली (सो) येथील जिल्हा परिषद शाळेत ‘कवी जेव्हा बोलू लागतो’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कवीशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
‘संवाद’ या नावाने लेखन करणारे साहित्यिक संतोष दवणे यांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत कवींचा जीवनप्रवास, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया आणि कवितेचा उगम कसा होतो याविषयी माहिती जाणून घेतली. “कविता कशी सुचते?”, “लेखनाची प्रेरणा कशी मिळते?” अशा प्रश्नांनी कार्यक्रमात उत्सुकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गंगाराम ढमके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तेजस्विनी शिरवले, संदेश यशवंतराव, सखी सावित्री समिती तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी कौशिक विठ्ठल केदार, शाहीन युनूस शेख आणि स्वयंसेविका साक्षी दवणे यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कवी संतोष दवणे यांनी ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर करत विद्यार्थी व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश यशवंतराव यांनी केले. सावरोली गावचे पोलीस पाटील भगवान दवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, वृत्तरत्न नव महाराष्ट्र ठाणे जिल्हा संपादक शंकर गायकवाड तसेच सखी सावित्री समितीच्या सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रमात कवी म्हणून उपस्थित असणारे संतोषजी दवणे यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


Post a Comment
0 Comments