Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पालघरमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य पदयात्रा; जिल्हा प्रशासन, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

 


प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

पालघर, दि. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघर शहरात पाचबत्ती चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्राभिमान, शौर्य आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेला जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


सकाळी ठीक ७ वाजता पदयात्रेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसिलदार रमेश शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत सजलेली सांस्कृतिक पथके आणि ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा पुढे सरकत होती. एनसीसी, एनएसएस, स्काऊट-गाईड, ‘माय भारत’ स्वयंसेवक तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत कार्यक्रमाला वेगळेच तेज दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत सुशासन, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रसेवा यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्रितपणे आयोजन यशस्वी केल्याचे त्यांनी नमूद केले.


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना ऑनलाइन प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे युवकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


इतिहासाची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही पदयात्रा पालघरच्या सार्वजनिक जीवनातील एक संस्मरणीय घटना ठरली.



Post a Comment

0 Comments