शहापूर (प्रतिनिधी-शंकर गायकवाड ) : गेल्या चार दिवसांपासून शहापूर तहसील कार्यालयासमोर मयत शेतकरी तिवारी यांच्या वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदवून मिळावीत, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश मिळाले.
उपोषणकर्ते धीरज मुन्नाप्रसाद तिवारी यांनी जमिनीच्या हक्कासाठी ठिय्या देत आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर युवा नेते श्री. सुमित सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची बाजू सविस्तर ऐकून घेतली.
यानंतर त्यांनी शहापूर तहसील कार्यालय येथील तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी चर्चा केली. तसेच दूरध्वनीद्वारे प्रांत अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रकरणातील तांत्रिक बाबींचा आढावा घेत मध्यस्थी केली. संबंधित कागदपत्रे, वारस नोंदणीची प्रक्रिया व महसूल नियमावली यांचा विचार करून समाधानकारक तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.
दीर्घ चर्चेनंतर प्रशासनाने प्रकरण नियमांनुसार तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. युवा नेते म्हात्रे यांच्या मध्यस्थीला यश येताच तहसीलदार परमेश्वर कासुळे, शहापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, तसेच रमाई ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांच्या व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण सोडवण्यात आले.
चार दिवस चाललेल्या या आंदोलनाची अखेर सकारात्मक वातावरणात सांगता झाली असून, जमिनीच्या वारस हक्कासाठी लढणाऱ्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे.


Post a Comment
0 Comments