प्रतिनिधी : आनंद भालेराव
भिवंडी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी शहरात नुकतीच एक महत्त्वपूर्ण आणि उत्साहपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. सुजित जाधव उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी पक्षवाढ, संघटनात्मक अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न मांडले. कार्यकर्त्यांच्या मनातील शंका आणि अडचणी ऐकून घेत ॲड. सुजित जाधव यांनी सखोल आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले. पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी तसेच संलग्न संघटनांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी त्यांनी ठोस उपाययोजना सुचवल्या.
यावेळी कार्यकर्ता बांधणीवर विशेष भर देण्यात आला. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड, मजबूत कार्यकारिणी उभारणी आणि संघटनात्मक विस्तार यासाठी ठोस आराखडा निश्चित करण्यात आला. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका काय असावी, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जितेंद्र जाधव, अमोल तपासे, ॲड. अजिंक्य गायकवाड, ॲड. संदेश गायकवाड, सलीम सिद्दिकी, विजय भोईर, महेबूब अन्सारी, अबूलैस अन्सारी यांसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने पक्ष मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही बैठक पक्षासाठी नवी ऊर्जा देणारी ठरली असून, आगामी काळात भिवंडी व ठाणे जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments