प्रतिनिधी - आनंद भालेराव
कल्याणl (पूर्व) : महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर, कोळसेवाडी (कल्याण पूर्व) येथे दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य बॅनर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेस दिलेल्या विचारांचा, हक्कांचा व संविधानिक मूल्यांचा संदेश बॅनरच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध ठिकाणी माहितीपूर्ण बॅनर लावून मानवतेचा व समतेचा संदेश देण्याचे कार्य करण्यात आले.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे पारंपरिक मिरवणुका, ढोल-ताशा किंवा गाजावाजा न करता समाजातील तरुण, होतकरू विद्यार्थी तसेच वकील, इंजिनियर, गायक, डॉक्टर अशा बुद्धिजीवी तरुणांच्या कल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या विचारसरणीला ख्यातनाम गायक समर्थक शिंदे, महेश सकपाळ, अतिश पराड, कुंदन भोईर आणि अनिश म्हके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम, जय संविधान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

Post a Comment
0 Comments