प्रतिनिधी : आनंद भालेराव
टिटवाळा : भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 34 वर्षे प्रामाणिक व समर्पित सेवा बजावल्यानंतर स्टेशन प्रबंधक श्री सत्य वीर सिंह (वय 60) दिनांक 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेला गौरविण्यासाठी दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता आय.ओ.डब्ल्यू. स्टाफ रूम, टिटवाळा येथे भावपूर्ण सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले.
आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी एरिया कंट्रोलर कल्याण यार्ड, मुख्य यार्ड प्रबंधक कल्याण तसेच ट्रॅफिक इन्स्पेक्टर कल्याण अशा विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करताना शांत, संयमी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून सदैव सकारात्मक व सहकार्याची भूमिका त्यांनी निभावली.
टिटवाळा परिसरातील 80 वर्षांवरील सेवानिवृत्त रेल्वे कामगारांना फॅमिली पास मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरले. या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमात ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ तसेच कसारा शाखेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सचिव काॅ. आनंदा भालेराव, अध्यक्ष काॅ. प्रल्हाद खंदारे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी काॅ. दिलीप शिंदे, खजिनदार काॅ. आनंदा सोनावणे, सदस्य काॅ. जयवंत वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे अनुभव समाजकार्यात उपयोगी पडतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments