प्रतिनिधी-शंकर गायकवाड
मुंबई : खार (प.) येथील कोकणस्थ को-ऑप हौसिंग सोसायटी परिसरात बौद्ध जन पंचायत समिती आदर्श शाखा क्र. १४८, आम्रपाली महिला मंडळ, नालंदा बुद्ध विहार सांस्कृतिक मंडळ तसेच स्थानिक रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौतम बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांची जयंती ही केवळ उत्सव नसून समाजाला दिशा देणारा प्रेरणादायी सोहळा असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना बाबासाहेबांचा बुद्ध धम्म, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले त्यांचे योगदान तसेच कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष यावर सविस्तर भाष्य करण्यात आले. आजच्या घडीला मागासवर्गीय व कामगार वर्गाने संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देणे किती आवश्यक आहे, यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर समाजाने सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. अशा निर्णयांचा सामाजिक ऐक्य व संविधानिक हक्कांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन आपली भूमिका ठाम ठेवणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमास महिला, युवक व नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला. उपस्थितांनी दाखवलेला उत्साह हा बाबासाहेबांच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments