Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

“परभणी आयटीआयमध्ये शिक्षणाचा बाजार : विद्यार्थ्यांच्या भविष्याची उघडपणे हत्या; भ्रष्ट, निष्क्रिय व्यवस्थापनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी!”

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मोहन दिपके

“कौशल्य विकास” आणि “उज्ज्वल भविष्य” यांच्या गोंडस घोषणा देत विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या परभणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) अत्यंत संतापजनक, धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या भोंगळ, निष्क्रिय आणि बेजबाबदार व्यवस्थापनाने शिक्षण व्यवस्थेची अक्षरशः चेष्टा मांडल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.


एकीकडे शासन विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे, तर दुसरीकडे परभणी आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा उघडपणे “मृत्यूचा खेळ” सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील तब्बल सहा महिन्यांपासून विविध ट्रेडचे प्रॅक्टिकल केवळ कागदोपत्री सुरू असून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेच जात नसल्याचा संतापजनक आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.


विद्यार्थ्यांना तासन्तास वर्गात बसवून ठेवले जाते, मात्र प्रॅक्टिकलसाठी आवश्यक साहित्य, उपकरणे आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात नाही. “प्रशिक्षण” या नावाखाली विद्यार्थ्यांची केवळ दिशाभूल करून त्यांच्या करिअरशी क्रूर थट्टा केली जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. उद्या हेच विद्यार्थी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी गेले तर त्यांच्याकडे आवश्यक कौशल्य नसेल, याला पूर्णपणे जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे “रोजगार क्षमता कौशल्य” (ES) हा ५० गुणांचा महत्त्वाचा विषय असूनही या विषयाची मागील सहा महिन्यांत एकही तासिका घेण्यात आलेली नाही. गणित आणि चित्रकला या विषयांचीसुद्धा तीच अवस्था आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.


वेळापत्रकानुसार अध्यापनाची जबाबदारी असलेले गटनिर्देशक बि. डी. काळे, घयाळ जी. ई., आर. बी. डोईफोडे, एम. के. ब्राम्हणे, एस. के. वाघमारे, भातलवंडे एस. जी. आणि एस. पी. वाकोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडल्याचा संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या सर्व प्रकाराचा विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.


याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थी जेव्हा तक्रार घेऊन संस्थाप्रमुख किंवा नियोजन समितीकडे जातात तेव्हा त्यांना “मार्क्स कमी करू”, “कारवाई करू” अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या दडपशाहीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका महिन्यावर परीक्षा येऊन ठेपलेल्या असताना विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन किंवा प्रॅक्टिकल न देता त्यांना परीक्षेच्या खाईत ढकलले जात आहे. त्यामुळे होणाऱ्या परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त होतील का? यावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


संस्थेतील मूलभूत सुविधांची अवस्था देखील अत्यंत दयनीय आहे. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र महिला कक्ष नाही, बाथरूमची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. शासनाकडून लाखो रुपयांचा निधी येत असताना तो निधी नेमका जातो कुठे? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बळी घेणाऱ्या या भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थापनावर तात्काळ कठोर कारवाई करून दोषींना निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


आता प्रशासनाने वेळ न दवडता या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.



Post a Comment

0 Comments